पुणे : ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्यातील कायदेतज्ज्ञ, पत्रकार, तत्त्वज्ञ, राजकारणी समजून घेऊन त्यांचे विचार आपण आचरणात आणायला हवेत. आजच्या तरुणांनी बाबासाहेबांना अभिप्रेत कार्य उभारण्यासाठी शिक्षणाकडे गांभीर्याने पाहायला हवे. तरुणांच्या मानसिकतेत बदल करण्यासाठी हा पुस्तक वाटपाचा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल,’ असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीतर्फे ‘नाचून मोठे होण्यापेक्षा वाचून मोठे होऊया’ या उपक्रमाअंतर्गत महापुरुषांची १० हजार चरित्र पुस्तके वाटण्यात आली. ‘छत्रपती-फुले-शाहू-आंबेडकर विचाररथा’तून या पुस्तकांचे वाटप सारसबाग परिसरातील अण्णाभाऊ साठे पुतळ्यासमोर झाले. त्यावेळी ते बोलत होते.
या प्रसंगी नगरसेवक महेश लडकत, सिस्टर मरिसा ए. सी., माजी नगरसेवक राहुल तुपेरे, बाळासाहेब दाभेकर, संघर्ष समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शशिकांत कांबळे, श्री आदिशक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष दत्ता पवार, सचिव गिरीश शिंदे, सचिन गजरमल, गणेश आबनावे, योगेश सुपेकर, संजय पोमण यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज, गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शहीद भगतसिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस, कर्मवीर भाऊराव पाटील आदी महापुरुषांची चरित्र पुस्तके, तसेच भारतीय राज्यघटनाही या वेळी तरुणांना वाटण्यात आली.
उपक्रमाविषयी बोलताना शशिकांत कांबळे म्हणाले, ‘बाबासाहेबांनी दिलेला ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा मूलमंत्र घेऊन त्यांना अभिप्रेत समाजाची निर्मिती व्हायला हवी. याच विचारांतून यंदाच्या जयंतीनिमित्त ‘नाचून मोठे होण्यापेक्षा वाचून मोठे होऊया’ हा संकल्प आम्ही सोडला आहे. मिरणूतकीत येणाऱ्या तरुणांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.’